भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. 16 मेच्या सुमारास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यानंतर तो वेगाने आगेकूच करत 26 मेपर्यंत केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतातील राज्यांसाठीही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 13 ते 19 मे दरम्यान ईशान्येकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 50 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण निर्माण होत असताना, दुसरीकडे उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रासाठीही ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होऊ शकतो, तर 6 जूनपर्यंत तो कोकण किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच 7 जूनच्या आसपास पुण्यात मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी मानली जात असून, शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.