नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत येणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसह राज्यभरातून प्रचंड टीकेची झोड उठली असून ते आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरामध्ये डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने भारत दुर्गा मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराचा शिलान्यास सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये बागेश्वर बाबा बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता-करता थकले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढला आणि म्हणाले की, मी लढाई करून-करून थकलो आहे. मला आता लढायचं नाही, त्यामुळे हे मुकुट आणि राज्य तुम्ही सांभाळा. आम्ही तुमच्या आदेशाने चालतो आम्हाला विश्राम हवा आहे.
यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, हे मी स्वीकारतो पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही माझे कोण आहात? त्यावर महाराज म्हणाले मी तुमच्या शिष्य आहे. तर रामदास स्वामी म्हणाले मी कोण आहे? त्यावर महाराज म्हणाले तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं शिष्याचे कर्तव्य काय? शिवराय म्हणाले जो गुरु आदेश देतील तो. त्यानंतर रामदास स्वामींनी मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातला आणि म्हणाले आजपासून हे राज्य माझं आहे, पण आज्ञा तुम्हाला आहे की याचं संचलन तुम्ही करायचा आहे. असं म्हणत बागेश्वर भावाने हा वादग्रस्त किस्सा सांगितला.
मात्र यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संघ भाजपने पोसलेले, गायपट्ट्यातून महाराष्ट्रात येत आपला महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी बाबांना महाराष्ट्रातील जनतेनेच आता चपलांचा मार देत हाकलून लावायला हवे. आज तर या भोंदूने विधान केलेय की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि थकलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून रामदास स्वामींच्या चरणी ठेवला. आपला राज्यकारभार त्यांनी पाहावा अशी विनंती थकलेल्या महाराजांनी केली…” या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे.