भारतातील आर्थिक परिस्थिती आगामी काळात गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी दिला आहे. मंगळवारी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या वार्षिक बिझनेस समिटमध्ये बोलताना त्यांनी जागतिक परिस्थिती आणि भारतासमोरील आर्थिक आव्हानांबाबत चिंता व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले उदय कोटक?
उदय कोटक यांचे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे, पेट्रोल-डिझेलवरील खर्च कमी करण्याचे आणि परदेश प्रवासावर संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोटक यांनी देशाने संभाव्य आर्थिक संकटासाठी सज्ज राहण्याची गरज अधोरेखित केली.
ते म्हणाले, “आपण अशी अपेक्षा ठेवली पाहिजे की परिस्थिती नियंत्रणात राहील. मात्र, सर्वात वाईट परिस्थितीची तयारी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संकट येण्याची वाट पाहण्यापेक्षा आधीपासूनच सज्ज राहणे अधिक योग्य ठरेल.”
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर फारसा जाणवला नसला, तरी आता त्याची झळ अधिक तीव्रतेने जाणवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. “धोका आता दारात उभा आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे अमेरिका-इराण संघर्ष थांबणे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदय कोटक यांनी सांगितले की, जगातील परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि पूर्वीसारखे “सर्व काही पुन्हा नॉर्मल होईल” अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. त्यांच्या मते, जागतिक स्तरावर शक्तिशाली देशांचे वर्चस्व वाढत असून जग हळूहळू 1945 पूर्वीच्या स्थितीकडे जात आहे, जिथे “ज्याची ताकद त्याचे राज्य” असा नियम होता.
याचबरोबर त्यांनी भारतातील उद्योग आणि व्यवसाय अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. अमेरिकेचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेची खरी ताकद केवळ सरकारमध्ये नसून तेथील प्रभावी उद्योग आणि जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये आहे. भारतानेही केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील असे मजबूत उद्योग आणि दर्जेदार उत्पादने निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक प्रभावी आणि सक्षम होऊ शकते.