मुलांची सुट्टी की पालकांची चिंता ?
मुलांची सुट्टी की पालकांची चिंता ?
उन्हाळा सुरू झाला की शाळांना सुट्टी लागते आणि घरात मुलांची लगबग वाढते. अनेक घरांमध्ये ही वेळ आनंदाची असली तरी काही पालकांसाठी ती चिंतेची ठरते. “मुलं दिवसभर घरी असतात”, “मोबाईलवर बसून राहतात”, “घरात गोंधळ घालतात” अशा तक्रारी या काळात वारंवार ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेक पालकांचा पहिला आणि सोपा उपाय म्हणजे मुलांना विविध क्लासेसमध्ये पाठवणे. नृत्य, चित्रकला, अबॅकस, समर कॅम्प अशा उपक्रमांची यादी तयार होते आणि मुलांची सुट्टी पुन्हा एकदा वेळापत्रकांच्या चौकटीत अडकते.
निश्चितच, अशा क्लासेस आणि उपक्रमांचा मुलांच्या विकासासाठी उपयोग होतो. नवीन कौशल्ये शिकण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी त्यातून मिळते. परंतु मुलांचा सर्वांगीण विकास केवळ क्लासेसमधूनच होतो असे मानणे ही एक चुकीची समजूत आहे. खरं तर उन्हाळ्याची सुट्टी ही मुलांच्या आयुष्यातील अशी वेळ असते, जिथे त्यांना मोकळेपणाने शिकण्याची, अनुभव घेण्याची आणि स्वतःला शोधण्याची संधी मिळते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालक आणि मुलांना एकत्र बसून निवांत बोलण्यासाठीही वेळ मिळत नाही. शाळा, ऑफिस, गृहपाठ, क्लासेस आणि डिजिटल जग या सगळ्या गोष्टींमध्ये संवादाचा धागा अनेकदा सैल होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्याची सुट्टी ही पालक-मुलांमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी एक मौल्यवान संधी ठरू शकते. मुलांसोबत वेळ घालवणे ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट असते. ही भेट कोणत्याही महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा क्लासेसपेक्षा अधिक मौल्यवान असते.
या काळात पालकांनी मुलांसोबत काही साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, एकत्र स्वयंपाक करणे, घरातील छोट्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेणे, एखादे पुस्तक वाचून त्यावर चर्चा करणे किंवा आपल्या लहानपणीच्या आठवणी मुलांना सांगणे. अशा छोट्या कृतींमधून मुलांना जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहज शिकता येतात. जबाबदारीची जाणीव, सहकार्याची भावना आणि कुटुंबातील नात्यांचे महत्त्व यांची ओळख या अनुभवांमधूनच होते.
आज अनेक पालकांची एक मोठी तक्रार म्हणजे मुलं सतत मोबाईल किंवा स्क्रीनमध्ये गुंतलेली असतात. परंतु केवळ मोबाईल वापरावर बंदी घालून हा प्रश्न सुटत नाही. त्यासाठी मुलांना पर्यायी आणि आकर्षक उपक्रम उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. चित्रकला, हस्तकला, बागकाम, छोट्या प्रयोगांवर काम करणे, घरात छोटे प्रकल्प तयार करणे किंवा डायरी लिहिणे अशा अनेक गोष्टी मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देऊ शकतात. या उपक्रमांमुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढते आणि ते स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा आनंद अनुभवतात.
उन्हाळ्याची सुट्टी ही मुलांना जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव देण्याचीही योग्य वेळ आहे. मुलांना बाजारात घेऊन जाणे, एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी करणे, गावाला भेट देणे किंवा निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवणे या अनुभवांमधून मुलांना जीवनाचे वास्तव समजते. निसर्गाशी जवळीक निर्माण होते आणि समाजातील विविध घटकांविषयी संवेदनशीलता वाढते. अशा अनुभवांचे शिक्षण कोणत्याही पुस्तकातून किंवा वर्गातून मिळत नाही.
याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे मुलांना कधी कधी कंटाळा येऊ देणेही गरजेचे असते. आज अनेक पालक मुलांना सतत काहीतरी कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मोकळा वेळ आणि कंटाळा हेच अनेकदा सर्जनशीलतेचे मूळ असतात. जेव्हा मुलांना काहीच ठराविक काम नसते, तेव्हा ते स्वतः नवीन खेळ, नवीन कल्पना आणि नवीन उपक्रम शोधू लागतात. हीच प्रक्रिया त्यांच्या विचारक्षमतेला चालना देते.
उन्हाळ्याची सुट्टी ही केवळ वेळ घालवण्याची किंवा मुलांना व्यस्त ठेवण्याची गोष्ट नाही. ती मुलांमध्ये जीवनमूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन, सहकार्य, संयम आणि कृतज्ञता यांसारखी मूल्ये या काळात सहज शिकवता येतात. अशा मूल्यांचा पाया बालपणीच मजबूत झाला तर पुढील आयुष्यात त्याचा मोठा फायदा होतो.
म्हणूनच पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीकडे “समस्या” म्हणून पाहण्याऐवजी “संधी” म्हणून पाहणे गरजेचे आहे. मुलांना सतत क्लासेसमध्ये गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या सोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्यासोबत अनुभव शेअर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
म्हणूनच प्रत्येक पालकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा या उन्हाळ्यात आपल्या मुलांसाठी आपण किती आठवणी तयार करणार आहोत? कारण आयुष्य पुढे जात असताना मुलांच्या मनात कायम राहतात त्या कुटुंबासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांच्या आठवणी. (फोटो AI Gemini)
पल्लवी चिकारे
युवा रुरल असोशिएशन, नागपूर
(स्किल इंडिया सर्टिफाइड पॅरेंटिंग कोच
‘सुजाण पालकत्व’ उपक्रम समन्वयक, युवा रुरल असोशिएशन, नागपूर
9890665676
pallavi.chikare@yraindia.org)