रॉ मोसादची री ओढतोय का ?

0 73

रॉ मोसादची री ओढतोय का ?

०२ जानेवारी २०२३ला,हमास या पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ नेता, सालेह अल अरौरीची लेबनानमधील बॉम्ब स्फोटात झालेली हत्या अपेक्षितच होती. अल अरौरी,हमासचा काँटॅक्ट टीम लीडर देखील असल्यामुळे लेबनान येथील अती जहाल आतंकी हिजबुल्लाह, तीचे इराणमधील मदतगार आणि हमासमधील दुवा होता.१९९०मधे उदयास आलेल्या,इझ एल दीन अल कासीम या हमासी   हत्यारबंद ब्रिगेडचा तो जन्मदाता आणि सर्वेसर्वा ही होता. इस्त्रायलवरील जवळपास सर्वच हल्ले या ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या खाती जमा असल्यामुळे, हमासनी इस्रायलवर ०७ ऑक्टोबर, २०२२ला केलेल्या हल्ल्याच्याही आधीपासूनच तो इस्रायल इंटलिजन्स एजंसींच्या,विशेषत: मोसादच्या, पर्मनंट हिट लिस्टवर होता.

    अल अरौरीला मारण्यासाठी मोसाद अथक प्रयत्न करत होती कारण; अ) २०२१पासून अरौरीनी इस्रायलवर हल्ले करण्यासाठी “रमदान का  र्निव्हल्स” आयोजित करण सुरू केल होत. कुरणानुसार रमदानच्या पवित्र महिन्यात ज्यूंची हत्या केल्यास स्वर्ग प्राप्ती होते या अपप्रचारांतर्गत हे हल्ले होत असत; ब) २०२३च्या रमदान कार्निव्हलमधे वेस्ट बँक आणि जेरुसलेममधे ७० इस्रायली मारल्या गेले होते; क) वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेममधील जिहादी कारवायांना मदत करण्यासाठी अरौरी जॉर्डन, टर्की आणि इराणकडून “टेरर फंडस्” मिळवत असे; ड) कतार, युनायटेड अरब एमिरात आणि सौदी अरेबियामधील, मूलपंथी जिहाद्यांच्या दृष्टिनी, मवाळ असलेल्या सरकारांच्या विरोधात तो कार्यरत असल्यामुळे; त्या राष्ट्रांना सुध्दा अरौरी नको असल्यामुळे मोसादला त्याच्या हत्येची खुली मोकळीक होती; इ) गाझा पट्टीतून होणाऱ्या इस्रायलविरोधी कारवाया आणि अल अस्क मशिदीतील ज्यूंच्या हत्येस अरौरीच जबाबदार होता.अल अरौरीच्या हत्येमुळे हमास व इस्रायलमधील सामरिक संबंध एक नवीन व अतिशय स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहेत. त्याची परिणीती कशात होईल याची पुसटशीही कल्पना करता येत  नाही.

 अल अरौरीच्या हत्येबाबत इस्रायलनी उडत, मोघम वक्तव्य केल आहे. पण सर्वच संरक्षणतज्ञाच्या मते अरौरी हत्याकांड,इस्रायली इंटलिजन्स एजन्सींच्या मोसादनीच केल आहे. ñस्वतंत्र झाल्यापासून; जर्मनी व अरब मुस्लिम देशांतील इस्रायली शत्रूंच्या विविध देशांमधील असंख्य हत्या (एक्स्ट्रा ज्युडिशियल असॅसीनेशन्स) मोसादच्या नावे आहेत. त्यांच्या अदमानानुसार मोसादनी इस्रायलच्या जवळपास २८००  शत्रूंना मारल आहे.कोणत्याही पाश्चिमात्य सिक्रेट सर्व्हिंसनी केलेल्या हत्यांपेक्षा ही संख्या खूपh जास्त आहे.

        मोसाद विदेशातील इस्रायली शत्रूंच्या वेचक हत्या करण्या/घडवून मधे (टार्गेटेड किलिंग्ज) माहीर आहे.हमासनी ०७ ऑक्टोबर, २०२३ला इस्रायलवर केलेल्या हल्यानंतर इस्रायलनी, ”नजदिकी भविष्यात, जगात कुठेही लपलेल्या हमासच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आम्ही नक्की ठार करू” अशी स्पष्ट धमकी दिली होती. “हमास लीडर्स वुड बी टार्गेटेड इन गाझा,वेस्ट बँक,लेबनान, टर्की, कतार; एव्हरी व्हेअर” अशी ग्वाही ०९ ऑक्टोबर, २३ला इस्रायली इंटलिजन्स प्रमुख, रोएन बारनी इस्रायली सिनेटसमोर दिली होती आणि त्यावेळी तो, हवेतील गमजा करत नव्हता. मोसादची सामरिक कार्यशैली आणि त्यांचा,कुठल्याही देशातील खबऱ्या/मारेकऱ्यांचा (इन्फर्मर्स अँड किलार्स) जमावडा उल्लेखनीय व जग प्रसिध्द आहे.मुस्लिम शियांपंथीयांच्या आतंकी वर्चस्वाखाली असलेल्या,दक्षिण बैरुटच्या दाहीयेह या उपनगरातील हिजबुल्लाहच्या मुख्यालया जवळच अल अरौरीची हत्या करण्यात आली होती.हिजबुल्लाहसारख्या कट्टर शत्रूच्या मुख्यालया शेजारी,त्यांच्या नंबर दोनच्या नेत्याची हत्याकरून मोसादनी त्यांची कार्यपद्धत आणि सामरिक कार्यकुशलतेेची चुणूक दाखवून दिली आहे.हा लेख लिहित असतांनाच इस्रायलनी ०७ जानेवारी,२०२४ला;हिजबुल्लाहचा रदवान फोर्स कमांडर, विसम अल ताविलचा लेबनानमधील मजदल सेल्म् आणि रॉकेट फोर्स कमांडर हसन हकाशहचा सिरियातील बेल्ट जिनमधे गेम केल्याची बातमी आली आहे.इस्रायली सूत्रांनुसार,युद्ध सुरू झाल्यापासून आजपर्यंत हिजबुल्लाहचे ३८ आणि हमासचे ५१ एजंट्स इस्रायल इंटलिजन्सच्या रोषाला युद्ध क्षेत्राबाहेर बळी पडले आहेत.

     इस्रायल हमास लीडर्सचा खातमा करण्यासाठी कटिबध्द आहे. मात्र हे करतांना, मोसादला; दोहा, अंकारा, बैरुट,दमास्कस आणि मध्यपूर्वेतील इतर महानगरांमधे वास्तव्यास असलेल्या हमास नेत्यांना,इस्रायलच्या सीमेबाहेर जाऊन मारावे लागेल कारण हे सर्व तेथे ऐशो आरामात राहताहेत.मोसादच्या सामरिक कौशल्य आणि कर्तृत्वाची ही एक कसोटी असणार आहे. इस्रायलच्या इंटलिजन्स प्रमुखांनी तेथील सिनेटला दिलेला शब्द खरा करून दाखवण्यासाठी मोसादला ही परिक्षा द्यावीच लागेल.

    ही परिक्षा देतांना,हमास नेत्यांच्या हत्येचा विडा उचललेल्या मोसादला,तीच्या कार्य पद्धतीच्या काही स्पष्ट खुणा (ऑपरेशनल सिग्नेचर्स) मागे सोडण्याचा धोका पत्करावा लागेल.अस झाल तर, मोसादची सामरिक कार्य पद्धत (ऑपरेशनल मेथड्स),सामरिक क्षेत्र (आर्क ऑफ ऑपरेशन), सामरिक सीमा (ऑपरेशनल रीच) व घातपाती हेरांच जाळ (एस्पीयॉनेज नेटवर्क) देखील उघड होण्याचा (एक्सपोझर) धोका आहे. अल अरौरीच्या हमास मुख्यालया जवळच झालेल्या हत्येमुळे, त्यांच्या संरक्षित बालेकिल्ल्यातील मर्मस्थान उजागर झाली आहेत. त्याच बरोबर, “माझ/आपल भवितव्य काय” या आशंकेनी ग्रासलेल्या गाझा पट्टी बाहेरील हमास नेत्यांची गाळण उडून मन:शांती भंग झाली असेल. अस म्हणतात की अल अरौरीला मारण्यासाठी मोसादनी ड्रोन्स वापरले होते. हे खर असेल तर, उर्वरित हमास नेत्यांचा हत्येसाठीही मोसाद हीच पद्धत अंगिकारेल या भींतीतर्गत ते सर्व नेते मोसादी ड्रोन्सविरुद्ध संरक्षण मागण्याची(अँटी ड्रोन प्रोटेक्शन) आशंका नाकारता येत नाही.

         ज्या दिवशी अल अरौरीची हत्या झाली त्याच दिवशी टर्कीनी देशांतर्गत कारवाई करून, मोसादसाठी हेरगिरी आणि घातपाती कृत्य करण्याच्या आरोपांखाली ३४लोकांना अटक केली.नंतर,०३ जानेवारीला टर्की इंटलिजन्स एजंसींनी, उर्वरित १२ संशयितांना याच आरोपाखाली ताब्यात घेण्यासाठी ५७ ठिकाणी छापे मारले. संरक्षणतज्ञांनुसार टर्कीची ही कारवाई, अरौरीच्या हत्येनंतर इस्रायलच्या संभाव्य हल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केल्या गेली आहे. त्यांनी ही कारवाई घाबरून केली नाही हे दर्शवण्यासाठी टर्कीनी,“इस्रायलद्वारा टर्कीमधे हमासच्या नेत्यांची हत्या झाल्यास त्याला याची भारी किंमत चुकवावी लागेल” अशी दटावणी  इस्रायलला दिली आहे.”इस्रायलच्या या कारवाईमुळे, मध्य पूर्वेत राजकीय असंतोषाचा भयंकर उद्रेक होईल, तेथील स्वातंत्र्य वीरांच्या धमन्यांमधील विद्रोही रक्त सळसळू लागेल आणि पॅलेस्टाईन जगभरात त्याच्या विरुद्ध सा मरिक आघाडी उघडेल”अशी आशंका इराणनी व्यक्त केली आहे. एक मात्र खर की, मोसादच्या टार्गेट किलिंग संबंधातील आगामी संभाव्य कारवायांच्या भयामुळे टर्की, लेबनान, जॉर्डन आणि कतार; गाझा पट्टीत हमासच्या मदतीसाठी युद्धात उडी घेणार नाही/घ्यायच्या आधी चारदा विचार करतील.युद्धात उतरल्यास,या युद्धाची परिणीती (एस्केलेशन) क्षेत्रीय/जागतीक युद्धात होऊ शकते.

      हमास इस्रायल आणि भारत पाकिस्तानमधील सांप्रत परिस्थितीत विलक्षण/ लक्षणीय समानता दिसून पडते/येते.१९७१ युद्धातील लाजिरवाण्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान तेंव्हापासूनच भारताशी छद्म युद्ध (प्रॉक्झी वॉर) करतो आहे.याची सुरवात, सीमेवर होणाऱ्या गोळीबाराच्या छुटपुट घटनांनी झाली आणि; सीमोल्लंघन, सीमेच्या थोड आत येऊन केलेले सशस्त्र हल्ले,मोठया शहरांमधे झालेले छोटे आतंकी बॉम्ब स्फोट, मोठी हत्याकांड, हवाई घुसखोरी, संसदेवरील हल्ला, मुंबईवरील मोठा धाडसी हल्ला असे टप्पे पार करत भारताला पिडत राहिली. पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नाही. त्यानी; दाऊद इब्राहिम, सैयद सलालुद्दिन, मसुद अजहर, हाफिज सईदसारख्या असंख्य भारत विरोधी लोकांना राजाश्रय दिला.त्या बरोबरच;सय्यद गिलानी, असुद्द्दिन ओवेसी, फारुख अब्दुल्लासारख्या भारतातील जयचंदांना अलगाववादी कारवाया करण्यासाठी उद्युक्त केल. त्याच प्रमाणे; निज्जर, पन्नून  आझादसारख्या खालिस्तानी फुटीरतावादी लोकांना पैसे देऊन भारत विरोधात उभ केल. अमाप पैसे देत पाकिस्ताननी भारतातील प्रसारमाध्यमांना हाताशी धरून, आतंक्यांच उघड/ छुप समर्थन करणार पाकिस्तान धार्जिण वातावरण तयार केल. तसच त्यानी नक्सल समर्थनही सुरू केल.ऑगस्ट २०२०मधे कलम ३७० खारीज करून काश्मिरच्या भारतातील विलयाला पूर्णाकार देण्यात आला त्या वेळी हे पाक समर्थक,त्याला पाहिजे तसा गोंधळ घालू शकले नाहीत म्हणून पाकिस्ताननी; कॅनडा, अमेरिका, जर्मनी,ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व जर्मनी या पाश्चात्य देशात भारत विरोधी “डिसीडंट सेल्स” स्थापन केलेत/आधीच असलेल्यांना सेल्सना आर्थिक मदत केली. या डिसीडंट सेल्सनी ते असलेल्या देशांमधे; खालिस्तानच समर्थन करण्यासाठी आणि खारीज केलेल कलम ३७० पुन्हा लागू करून काश्मिरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, भारत विरोधी चळवळी सुरू केल्या. पाकिस्तानी/पाश्चात्य मुस्लिम आतंकी आणि त्यांच्या भारतीय मदतगार/समर्थकांनी देशात; बॉम्ब स्फोटस, वांशिक दंगे, कुठल्याही मुद्यावर निदर्शन, मोर्चे व धरणे, आणि येन केन प्रकारेण सरकारला पदच्युत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.भारत सरकारनी त्यांना शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले,अनेक पाऊले उचललीत, त्यांच्याशी शांतीपूर्ण, तार्किक वार्तालाप केलेत. पण त्यांनी आपला राग,हेका, हट्ट सोडला नाही आणि आपली कुटील कृत्य सुरूच ठेवलीत.

      मग नंतर एक दिवस अचानक; कोणा एका संघटनेचा नेता हॉस्पिटलमधे उपचार सुरू असताना मेल्याची बातमी आपण ऐकली.लगेचच, कुठल्याश्या दुसऱ्या संघटनेच्या नेत्याला दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून मारल्याची खबर ऐकायला आली.नंतर एका तिसऱ्याच संघटनेच्या नेत्याच अपघाती निधन झाल्याच वृत्त आल. मग एक दिवस, शत्रू देशातील बॉम्ब स्फोटांचा आणि त्यामुळे होणाऱ्या जीव व वित्त हानीचा गवगवा सुरू झाला.या घटनां/ वाकयांसाठी कुठलातरी “अननोन एक्स फॅक्टर” जबाबदार आहे हे हळूहळू, पाकिस्तान व पाक समर्थक पाश्चात्य देशांच्या लक्षात येऊ लागल. मग सुरू झाली; हा एक्स फॅक्टर कोणता, तो कुठून व कसा आला, त्याच्या मागे कोण आहे याची प्रसार माध्यमांमधील घमासान चर्चा. अशा चर्चा, आधी पाक राष्ट्रीय टेलिव्हिजन,पीटीव्हीवर झाल्यात आणि नंतर; या घटनांसाठी भारताची रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ, हीच जबाबदार आहे, अस दोषारोपण, असा कांगावा पाकिस्तान व पाश्चिमात्य राष्ट्रांनी सुरू केला. हळूहळू हे लोण भारत व जगातही पसरू लागल.

    खालिस्तान चळवळीचा एक नेता, निज्जर याच्या कॅनडामधे झालेल्या हत्येला भारतच जबाबदार आहे असा स्पष्ट आरोप त्या देशाचे पंतप्रधान ट्रूडूंनी तेथील संसदेत केला.अमेरिकेतील खालिस्तान समर्थक नेत्याच्या हत्येची सुपारी रॉनी एका भारतीय इसमाच्या माध्यमातून अमेरिकन हत्याऱ्यांना दिली असा आरोप करत बायडेन प्रशासनानी भारताला आपली बाजू मांडायला सांगितल.आपल मन स्वच्छ असणाऱ्या भारत सरकारने अर्थातच याचा सपशेल इन्कार केला व अजूनही करतो आहे. भारतातील विरोधी पक्षांनी, “यासाठी सरकारच जबाबदार आहे, सांप्रत सरकारनी प्रचलित धोरणांचा त्याग केला आहे” असा प्रचार सुरू केला.आपल्या येथील अनेक विचारवंत आणि प्रसार माध्यमांनी देखील हाच राग आलापला. सगळ्यांच्या मते, याला जबाबदार रॉ हीच भारतीय इंटलिजन्स एजंसीच आहे. पण कोणीच हे सिद्ध करू शकत नाही. जगभरातील “इंटलिजन्स गँबिट” असच काहीस धूसर आणि अकल्पित (हेझी अँड अनएक्स्पेक्टेड) असत. 

     भारत विरोधी शत्रूंचा खातमा विदेशात होतो आहे.हे कोण करतो आहे हे कोणालाच माहित नाही.पण फक्त भारत विरोधी लोक मारले जात असल्यामुळे,त्याला जबाबदार रॉ नाही तर कोण आहे हा प्रश्न उपस्थित होण/विचारल्या जाण नैसर्गिकच आहे.कदाचित पुढे या अनुत्तरीत प्रश्नाच उत्तर येणारा काळच देईल. 

photo – Google.

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लिखाण आणि व्याख्यान, रेफरन्स बुक ऑन डिझायस्टर मनजमेंट, आपत्ति व्यवस्थापन, चीर विजयी भारतीय स्थल सेना, भारतीय परमवीर, सुवर्ण मदिरातील झंझावात, ऑपरेशन ब्लु स्टार, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. मराठी, हिन्दी, इग्रजी वृत्तपत्रातून, मासिकातून ८०० चे वर लेख प्रसिद्ध आहेत. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Leave A Reply

Your email address will not be published.