केरलम ला मुख्यमंत्री कोण असणार.

तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे राजकीय धक्के बसल्यानंतर काँग्रेसने आता केरळमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. विधानसभा निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

के. सी. वेणुगोपाल यांना मोठ्या प्रमाणावर आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात असले, तरी पक्षाचे कार्यकर्ते आणि काही मित्रपक्ष सतीशन यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. गेल्या पाच वर्षांत यूडीएफचे नेतृत्व करताना सतीशन यांनी पक्ष संघटना मजबूत केली आणि निवडणुकीतील विजयाचे ते प्रमुख शिल्पकार मानले जात आहेत. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

दुसरीकडे, रमेश चेन्नीथला हे अनुभवी आणि दिल्ली दरबारात प्रभाव असलेले नेते मानले जातात. त्यांचे समर्थक आमदार त्यांच्या नावासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणूनही ते सध्या महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत स्पर्धा वाढल्यानंतर काँग्रेस हायकमांडने केरळमधील आमदार आणि मित्रपक्षांशी सल्लामसलत सुरू केली आहे. गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षनेता निवडीचा अधिकार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे अंतिम निर्णय आता हायकमांडकडून घेतला जाणार आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीत यूडीएफने 140 पैकी 102 जागांवर विजय मिळवत एकतर्फी यश मिळवले. त्यापैकी काँग्रेसने 63 जागा जिंकल्या असून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पदासाठी सतीशन, वेणुगोपाल आणि चेन्नीथला यांच्यातील स्पर्धेमुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

AICCचे निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी केरळमधील आमदारांसोबत चर्चा सुरू केली असून तिन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही आपापली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, यूडीएफमधील काँग्रेसचा महत्त्वाचा मित्रपक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगने सतीशन यांना उघड पाठिंबा दिला आहे. तसेच केरळ काँग्रेस (जोसेफ) पक्षाचाही कल सतीशन यांच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वेणुगोपाल समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

वेणुगोपाल हे राहुल गांधींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा प्रभाव असून केरळ निवडणुकीसाठी निधी उभारण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठीची अंतिम निवड काँग्रेस हायकमांडसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

AICCCM KeralamCongress - UDFKeralam
Comments (0)
Add Comment