राज्यपालांच्या निर्णयाने ममता बॅनर्जी सरकार बरखास्त.

राज्यपालांच्या निर्णयाने ममता बॅनर्जी सरकार बरखास्त.

 

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राज्यपाल आर. एन. रवी यांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत राज्य विधानसभा विसर्जित केली आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला असून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापनेचा दावा मजबूत केला आहे.

निवडणुकीत भाजपला २०६ जागांवर विजय मिळाला, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. तब्बल पंधरा वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे.

मात्र, निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले. “आमचे सरकार गेलेले नाही, आम्ही पराभूत झालेलो नाही. जनादेश लुटला गेला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती. “मी का पायउतार होऊ? राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,” असेही त्या म्हणाल्या होत्या.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यामुळे राज्यात सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपाल आर. एन. रवी यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७४(२)(ब) अंतर्गत अधिकारांचा वापर करत पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे.

विधानसभा विसर्जित झाल्यानंतर आता भाजपसमोर सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपकडून पुढील दोन दिवसांत सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJPपश्चिम बंगालच्याममता बॅनर्जीराज्यपाल आर. एन. रवीसंविधानाच्या अनुच्छेद १७४(२)(ब)
Comments (0)
Add Comment